दहावी बारावी परीक्षेसाठी यंदा केंद्रांच्या संख्येत चौपट वाढ!

https://ift.tt/u62UYTgyb
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरक्षित पार पडण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीसाठी मिळून असलेली सुमारे आठ हजार ३०० परीक्षा केंद्रे आता ३१ हजारांपर्यंत वाढणार आहेत. या अतिरिक्त केंद्राचा वापर गर्दी टाळण्यासाठी होणार आहे. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 'शाळा तेथे परीक्षा केंद्र' अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य मंडळाकडून परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. एका परीक्षा केंद्राअंतर्गत काही शाळा उपकेंद्र करण्यात येतील. त्याबाबत राज्य मंडळाने विभागीय मंडळांना मुख्याध्यापक-प्राचार्यांकडून माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक-दोन दिवसांत परीक्षा केंद्रांबाबतची माहिती जमा होईल, अशी माहिती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे आठ हजार ३०० परीक्षा केंद्रे होती. नव्या निर्णयानुसार परीक्षा केंद्रांत वाढ होऊन ती ३१ हजारांवर जाईल. परीक्षा कक्षात गर्दी होऊ नये; म्हणून एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थ्यांची परीक्षेची सोय असेल. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था झिगझॅग पद्धतीने करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्या शाळेतील विद्यार्थी जवळच्या केंद्रात राज्यातील काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची सोय करता येणार नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रांत परीक्षेसाठी जावे लागेल. परीक्षा केंद्रांबाबत काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यात येत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरक्षित पार पडव्यात, यासाठी राज्य मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने परीक्षा केंद्र वाढविण्याचा आणि एका वर्गात कमी विद्यार्थी असतील, अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tEVSHZ7P3

Post a Comment

Previous Post Next Post